अयोध्या राम मंदिरातील चोरी प्रकरण : 8 जणांना घेतलं ताब्यात, जाणून घ्या काय होती त्यांची भूमिका

अयोध्या राम मंदिर

फोटो स्रोत, Press Information Bureau (PIB)/Anadolu via Getty Images

फोटो कॅप्शन, तपास यंत्रणा मंदिर निधीत कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी त्यांच्या भूमिकेची चौकशी करत आहेत. (फाइल फोटो)
    • Author, अर्शद अफजल खान
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
    • Reporting from, अयोध्या
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

राम मंदिरातील दानपेट्यांमधून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याप्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अयोध्याचे एसएसपी गौरव ग्रोव्हर यांनी बीबीसी न्यूज हिंदीला दिली.

सर्व 8 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. या सर्वांना पुढील 1-2 दिवसांत मॅजिस्ट्रेट न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

एफआयआरमध्ये नाव असलेले सर्व संशयित आरोपी हे त्या टीमचे सदस्य होते, जी 40 दानपेट्यांतील अर्पण किंवा देणगी तीर्थयात्री सुविधा केंद्रात आणल्यानंतर त्याची मोजणी करण्याचं काम करत होती.

तपास यंत्रणा मंदिर निधीतील कथित गैरव्यवहारामध्ये त्यांच्या भूमिकेची चौकशी करत आहेत.

हा एफआयआर श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या तक्रारीवरून राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा भारतीय न्याय संहितेतील (बीएनएस) अशा कलमांखाली नोंदवण्यात आला आहे, जी कर्मचाऱ्याची चोरी, फसवणूक, विश्वासघात आणि गुन्हेगारी कटाशी संबंधित आहेत.

टिन्नू यादव, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, मनीष यादव, सुभाष श्रीवास्तव, करुणेश पांडे आणि रामशंकर मिश्रा अशी एफआयआरमधील नावं आहेत.

टिन्नू यादव देखरेखीची जबाबदारी सांभाळत होता, तर इतर सर्वजण रोख रक्कम मोजण्याच्या कामात होते.

राम मंदिर

फोटो स्रोत, Deepak Gupta/Hindustan Times via Getty Images

फोटो कॅप्शन, 13 जून रोजी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप समोर आल्यानंतर राम मंदिर ट्रस्टच्या विनंतीवरून एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. (फाइल फोटो)

तक्रारीनुसार, आरोपींनी परस्पर संगनमत करून भाविकांनी दिलेल्या देणगीची रकमेचा अपहार केला आणि ट्रस्टच्या निधीचा गैरवापर केला. हा प्रकार मंदिर परिसरातील दानपेट्यांतून जमा झालेल्या रकमेतील कथित गैरव्यवहाराशी संबंधित आहे.

13 जून रोजी आर्थिक अनियमिततेचे आरोप समोर आल्यानंतर ट्रस्टच्या मागणीवरून एका विशेष पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली होती.

या समितीचे अध्यक्ष विजय विश्वास पंत आहेत. या समितीत किरण एस आणि वित्त विभागाचे विशेष सचिव नीलरत्न कुमार यांचाही समावेश आहे.

या समितीला कार्यपद्धतीतील त्रुटी शोधण्याचे आणि यामागे काही मोठा कट आहे का हे तपासण्याचे काम सोपवण्यात आले होते.

ताब्यात घेतलेले आरोपी कोण आहेत?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

1. रामाशंकर यादव (टिन्नू)

जबाबदारी: दानपेट्यांवर लक्ष ठेवणे आणि त्यांना तळघरात नेणे.

आरोप: दानपेट्यांमधील कोट्यवधी रुपये हडप करणे, अपहार करणे आणि अयोध्या परिसरात मालमत्तांची खरेदी करणे.

2. लवकुश मिश्रा

जबाबदारी: देणगी आणि रोख रकमेची मोजणी करणे.

आरोप: देणगी देण्यात आलेल्या पैशांची चोरी करून कोट्यवधींची संपत्ती जमवणे. घरातून 12 लाख रुपये जप्त करण्यात आले.

3. अनुकल्प मिश्रा

जबाबदारी: काउंटिंग रूममध्ये (मोजणी कक्ष) रोख रक्कम मोजणे.

आरोप: काउंटिंग रूममधून पैसे चोरून बाथरूममध्ये लपवणे आणि लाखो रुपयांची मालमत्ता जमवणे.

4. सुभाषचंद्र श्रीवास्तव

जबाबदारी: कॅश काऊंटिग कर्मचाऱ्यांचे प्रभारी.

आरोप: देखरेखीतील निष्काळजीपणा आणि चोरीमध्ये सहभाग.

5. करुणेश पांडे

जबाबदारीः दान करण्यात आलेली रक्कम काऊंटिग रूमपर्यंत आणणे आणि त्याची मोजणी करणे.

आरोपः अर्पण केलेल्या रकमेची चोरी करून अयोध्या परिसरात मालमत्ता खरेदी करणे.

6. मनीष यादव

जबाबदारीः देणगी पेटीतून मिळालेल्या रोख रकमेची मोजणी करणे.

आरोप: धार्मिक अर्पणांची चोरी; घरातून 36 लाख रुपये जप्त.

7. अविनाश शुक्ला

जबाबदारीः देणगी पेटीतून मिळालेली रक्कम काऊंटिंग रूमपर्यंत आणणे आणि त्याची मोजणी करणे.

आरोपः अर्पण करण्यात आलेल्या रकमेतून मालमत्तांची खरेदी.

8. रामाशंकर मिश्रा

जबाबदारीः देणगी पेटीतून मिळालेली रक्कम काऊंटिंग रूमपर्यंत आणणे आणि त्याची देखरेख करणे.

आरोप: इतर आरोपींसोबत मिळून संगनमताने देणगीच्या निधीचा गैरव्यवहार करणे

देणग्यांच्या प्रश्नावरून उपमुख्यमंत्री संतापले

राम मंदिराच्या उभारणीसाठी जमा झालेल्या देणग्यांबाबत प्रश्न विचारल्यानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक संतप्त झाले.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "मी विचारतो, बाबरी मशिदीसाठी देणग्या गोळा केल्या होत्या का? केल्या होत्या ना? त्याबद्दल प्रश्न विचारा, कोणी विचारत आहे का?"

समाजवादी पक्ष आणि काँग्रेस 'तुष्टीकरणाचे राजकारण' करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजप सरकार भ्रष्टाचाराविरुद्ध 'शून्य सहिष्णुतेच्या धोरणावर' (झिरो टॉलरन्स) ठाम आहे, असंही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)