You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्रीधर अंभोरे : तुरळक रेषांमधून विश्व उभं करणारा 'रंगरेषांचा बादशाह', पाहा त्यांनी काढलेली चित्रं
रेषांचा किमयागार, रंगरेषांचा बादशाह, रेषांचा महाकवी, रेषांचा जादूगार नि रेषासम्राट, अशा कितीतरी विशेषणांनी जागतिक किर्तीचे प्रख्यात चित्रकार श्रीधर अंभोरेंच्या स्मृती जागवण्यात येत आहेत.
नुकतंच 10 ऑगस्ट रोजी वयाच्या 79 वर्षी त्यांचं निधन झालं.
साध्या-साध्या रेषांतून साहित्यिकांच्या शब्दांना फुलवणारी चित्रं साकारण्याचं काम श्रीधर अंभोरेंनी आयुष्यभर केलं. या रेषाच त्यांची ओळख आणि त्यांचं आयुष्य ठरल्या.
तुरळक रेषांमधूनही विश्व उभं करता येतं, हे दाखवून देणाऱ्या 'श्रीधररेषा' अखेर अगणित वळणांनंतर आता विसावल्या आहेत.
त्या अस्ताला गेल्या आहेत, असं म्हणणं धाडसाचं ठरेल. कारण, त्यांच्या मागे आता केवळ रेषाच उरली आहे, आणि त्या रेषेतून ते स्वतःही जिवंत आहेत, असं सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव म्हणतात.
ते म्हणतात की, "ते जन्मभर अविवाहित राहिले. त्यामुळे त्यांना ना आगा होता ना पिछा. त्यांच्या मागेपुढे अस्तित्व होते ते केवळ रेषेचे. ही रेषा त्यांच्या आयुष्याला पुरून उरली."
शेकडो पुस्तकांची मुखपृष्ठं, हजारो रेखाचित्रं
खरं तर श्रीधर अंभोरे यांनी कुठलंही औपचारिक कलाशिक्षण घेतलेलं नव्हतं. त्यांनी जे काही रेखाटलं, ते स्वयंस्फूर्तपणे.
अगदी तुकोबांच्या त्या अभंगाप्रमाणेच, 'अंतरीचे धावे, स्वभावे बाहेरी, धरितांही परी आवरेना.'
म्हणूनच, 'श्रीधर अंभोरे हे मला नेहमीच चित्रकलेतले बहिणाबाई चौधरी वाटत आलेले आहेत,' असं इंद्रजीत भालेराव म्हणतात ते उगीच नाही.
त्यांना हात धरून कुणीही चित्रकला शिकवलेली नव्हती. निरक्षर असूनही बहिणाबाईंनी मराठीत जशी अजरामर कविता लिहून ठेवली आहे, तशीच चित्रकला न शिकलेल्या श्रीधर अंभोरे यांनी अजरामर चित्रं तयार करून ठेवलेली आहेत.
त्यांचा जन्म अकोला जिल्ह्याच्या पातुर तालुक्यातील चिखलगावचा.
सरकारी वसतिगृहात राहून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. नंतर पोस्टात नोकरी लागली. आणि ही नोकरी करतानाच त्यांची रेषांशी मैत्री जुळली आणि अखेरपर्यंत त्याच त्यांच्या साथीदार ठरल्या.
यशवंत मनोहर म्हणतात त्याप्रमाणे, "रेषांच्या सुंदरसुंदर गुंफा निर्माण करण्याचा छंद त्यांच्या मनानं घेतला. या रेषांच्या कविताच त्यांच्या निर्मितीत वेल्हाळताना दिसतात. ते मनाचं तुटलेपण घेऊन शांतपणे तंद्रीत जात आणि मग रेषाच त्यांची जुळवाजुळव करीत. जीवनातील असंख्य जखमांचा अभ्यास करणारे श्रीधर अंभोरे अविवाहित होते. पण, आयुष्यभर त्यांनी त्यांच्या रेषांचे विवाह अपूर्व संवेदनशीलतेशी उत्कटपणे लावून दिले."
त्यांनी वेगवेगळ्या मराठी साहित्यिकांच्या जवळपास 300 हून अधिक पुस्तकांची मुखपृष्ठ रेखाटली. कित्येक दिवाळी अंकांना त्यांच्या चित्रांनी चारचाँद लावले.
वर्तमानपत्रं आणि मासिकांमधील असंख्य लेखांमधील शब्दांना त्यांच्या रेषांनी साथसोबत दिली. म्हणूनच 'साहित्यिकांचे चित्रकार' अशी त्यांची ओळख अधिक गडद राहिली.
ते पोस्टातील नोकरी करत होते, पण त्यांना साहित्यात रस होता. या आवडीतूनच ते साहित्यिकांच्या आणि प्रकाशकांच्या संपर्कात आले.
'हंस' मासिकाच्या अनंत अंतरकरांनी त्यांची चित्रं पाहिली आणि ती आपल्या मासिकात पहिल्यांदा 1975 साली प्रकाशित केली. त्यानंतर मग त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.
बाभूळबनानं शिकवली रेषाभाषा
प्रसिद्ध लेखक महावीर जोंधळे यांनी त्यांच्या आयुष्याचा वेध घेणारं 'श्रीधररेषा' नावाचं पुस्तक लिहिलंय.
महावीर जोंधळे लिहितात की, "श्रीधरची साधनं कमी आणि साधना जास्त हे सकृतदर्शनी दिसतं. निर्मिती प्रक्रिया जवळून पाहाता आली तेव्हा. रूढ अर्थाने त्याला स्टुडिओ लागत नाही. कुंचल्याशी मैत्री करावी लागत नाही. रंगान भरलेल्या हातातून कोणताही आर्विभाव प्रवाहित होत नाही. हे सगळं ज्याला अमान्यचं आहे. तो आत्मबाह्य एक असतो. मनात जे बागगलेलं आहे त्याचं संग्रहालय म्हणजे श्रीघर, असं ओघानेच म्हणावं लागतं. आणि तेच रास्त होईल देखील. कारण स्वयंसिद्ध रेषाच त्याचं भांडवल आहे."
पण त्यांनी ही रेषाभाषा कुठून अवगत केली आणि तीच त्यांची जीवनरेषा कशी बनली, याबाबतची माहिती त्यांनी स्वत:च एका मुलाखतीत दिली आहे.
प्राध्यापक मिलिंद कसबे यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते आपली चित्रभाषा शिकण्याची सुरुवात कुठून झाली, याचा खुलासा करतात.
ते सांगतात की, "लहान मुलाची अभिव्यक्त होण्याची पहिली भाषा चित्राची असते. ते कशावरही चित्र काढतं, तसं लहानपणी वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच मी कोळशानं भिंतीवर चित्र काढायचो. भिंत खराब केली म्हणून, मायेनं-बयेनं (आज्जी) अनेकदा मारलं. आमच्या वऱ्हाडामध्ये प्रचंड उन. आणि घरासमोर बाभूळबन होतं. याच बाभूळबनानं मला चित्रांची दृष्टी दिली. त्याच रेषा मला दिसायच्या. तोच माझा गुरू आहे."
निमंत्रण पत्रिकांचा वेगळा ट्रेंड
श्रीधर अंभोरे पोस्टातील नोकरी सांभाळून ही रेषाकारिताही करत होते. सोबतीला 'आदिम' नावाचं लघु नियतकालीक देखील काढत होते.
खरं तर अशा 'लिटल मॅगझिन्स'चा तो काळच होता. या काळात त्यांनी स्वत: लेखक, संपादक, चित्रकार, सजावटकार अशा विविध भूमिका पार पाडल्या.
नंतर मोठे सिने अभिनेते झालेले सदाशिव अमरापूरकरदेखील या काळात त्यांच्यासोबत या आदिम नियतकालिकाच्या कामात होते, हे विशेष.
फक्त दिवाळी अंकाची सजावटच नव्हे तर घरगुती, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकांचा एक वेगळा ट्रेंडदेखील त्यांनी निर्माण केला होता.
याबाबतचा एक किस्साही आहे. त्यांनी रेखाटलेली अशीच एक सुंदर पत्रिका पुलं देशपांडेंच्या हाती लागली.
पुलंनी जाहीर कार्यक्रमात तिचा उल्लेख केला आणि चित्रकाराला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.
सुप्रसिद्ध लेखक विजय तेंडूलकरांनाही त्यांची चित्र आवडायची. त्यावेळी, तेंडूलकर दूरदर्शनवर 'दिंडी' नावाचा एक कार्यक्रम चालवायचे. त्यातही श्रीधर अंभोरे यांच्या मुलाखतीचा एक कार्यक्रम त्यांनी केला होता.
त्यांची ही मुलाखत विद्यार्थ्यांसाठी एक धडा म्हणून महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमातील 'कुमारभारती' या पाठ्यपुस्तकात घेण्यात आली होती.
अंभोरे यांनी ताडोबा, मेळघाट आणि इतर ठिकाणच्या जंगलांना भेटी दिल्या होत्या आणि तिथली झाडे, बांबूची रोपे व निसर्गाच्या विविध रूपांची रेखाटनं करत अनेक दिवस घालवले होते.
या चित्रांमधून, काव्यात्मक रेषांनी तयार केलेल्या काळ्या-पांढऱ्या जागांच्या तीव्र विरोधाभासातून, वन्य निसर्गाची परिसंस्था तसेच शेतकरी व आदिवासी महिलांची मानवी दुर्दशा प्रतिबिंबित करण्यात ते यशस्वी ठरले.
'पंडोल आर्ट गॅलरीच्या' 'Visual Art of Maharashtra' मध्ये 18 व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते 21 शतकापर्यंतच्या चित्रकारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे.
त्यात श्रीधर अंभोरे यांच्या चित्राविषयी लिहिलंय की, "त्यांच्या चित्रांतील मानवी आकृत्यांना क्वचितच तपशीलवार चेहरे असतात, जणू काही त्यांच्या अनिश्चित अस्तित्वाशिवाय त्यांना स्वतःची अशी कोणतीही ओळख नाही, असं सुचवण्यासाठीच जणू."
"अंभोरे यांना त्यांच्या प्रवाही आणि विरूपित रेषांमधून, संरचनात्मक स्वरूपाची एक समृद्ध रचना विणून, आदिम लोक आणि निसर्गाची विविधता टिपायला आवडते. ही चित्रे, त्यातील विरूपता आणि सामाजिक भाष्य यांसह, भोळेपणा आणि आधुनिकतेच्या उदात्त मिश्रणाने दर्शकाला प्रभावित करतात."
'रेषेवर जीव ओवाळून टाकावा, अशी किमया'
श्रीधर अंभोरे यांचा मित्रपरिवार मोठा होता. अनेक साहित्यिकांशी त्यांची चांगली मैत्री होती. ते चित्रकार तर होतेच, शिवाय चांगले कवीही होते.
गझलकार श्रीकृष्ण राऊत त्यांच्याबद्दल म्हणतात की, "श्रीधर अंभोरे चित्रकार, कलावंत होते. त्यापेक्षाही त्यांचा भला मोठा गोतावळा होता. त्यांच्या रेषेवर जीव ओवाळून टाकावा, अशी किमया त्यांच्या बोटात होती. त्यांनी महाराष्ट्रभर शेकडो मित्र जोडले. त्या सर्व मित्रांच्या कुटुंबाचा ते 'घरचा माणूस' झाले होते. त्यांच्या रेषेवर जीव ओवाळून टाकावा अशी किमया त्यांच्या बोटात होती. पु.ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे अशी थोर मंडळी त्यांच्या रेषेच्या प्रेमात पडली."
त्यांच्या जाण्यानंतर ही रेषा आता पोरकी झाल्यानेच साहित्यविश्वातून प्रचंड हळहळ व्यक्त होते आहे.
त्यांना फाय फाउंडेशन पुरस्कार, साहित्य- माणिक उत्कृष्ट मुखपृष्ठकार पुरस्कार, पद्मश्री विखे पाटील फाउंडेशन पुरस्कार, अजिंठा पुरस्कार, पद्मश्री दया पवार पुरस्कार, अ. भा. मायबोली मराठी साहित्य संघाचा 'विदर्भ भूषण' असे अनेक पुरस्कार मिळाले.
पण, इतके मोठे चित्रकार असूनही त्यांनी कधीही जमीन सोडली नाही, असं 'शब्दशिवार'चे संपादक इंद्रजीत घुले सांगतात. शेवटच्या काळात अंभोरेंनी 'शब्दशिवार', 'नब्ज' अशा अंकांसाठी मोफत काम केलं.
"अंभोरे यांनी आपल्या कामासाठी कधीही कुणाकडून पैसे घेतले नाहीत. चित्रांचा व्यवसाय करण्याला त्यांचा ठाम विरोध होता. असा व्यवसाय करणाऱ्यांनी कितीही पैसे देऊ करू, म्हटलं तरीही ते कधीही तयार होत नसत."
'Visual Art of Maharashtra' मध्ये त्यांच्याविषयी लिहिलंय की, 'अंभोरे यांच्या कलाकृतींमधील सांस्कृतिक आशय हा 1960 आणि 1970 च्या दशकातील त्या मराठी साहित्यातून आला आहे, ज्यानं दलित आणि शोषित वर्गाची नवी सौंदर्यदृष्टी मांडली होती. त्या काळातील मराठी साहित्यासोबतच अंभोरे यांची रेखाचित्रेही अधिक समर्पक ठरली आणि त्यांना साहित्यविश्वात व्यापक मान्यता मिळाली.'
'त्याच वेळी, त्यांची कला के. के. हेब्बार आणि अल्मेलकर यांच्या रेखाचित्रे व चित्रकलेच्या समांतर असली, तरी त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. त्यांची कला प्रामुख्याने साहित्यिक मासिकांच्या पानांपुरतीच मर्यादित राहिली आणि तिला केवळ 'इलस्ट्रेशन' (चित्रण) किंवा 'फिलर' (रिकामी जागा भरण्यासाठीचे चित्र) यांसारखी दुय्यम भूमिका मिळाली. अंभोरे यांनी आपल्या रेखाचित्रांचे कधीही कोणतंही प्रदर्शन भरवलं नाही.'
आपल्या अखेरच्या काळात त्यांनी अहिल्यानगर सोडून जालन्याला आपल्या पुतण्याकडे आधार शोधला होता. कोरोना काळासापासून ते जालन्याला मुक्कामी होते.
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणतात की, "रेषेच्या बळावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारा निर्मळ मनाचा माणूस आपल्यातून निघून गेला. अंभोरे फार मोठे चित्रकार होते, परंतु तो मोठेपणा त्यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कधीही मिरवला नाही, हे त्यांचं आणखी एक मोठेपण होतं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)