महाराष्ट्रातील 'या' 4 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, जाणून घ्या पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

4 सप्टेंबरपासून पुढील 5 दिवस राज्यात पाऊस आणि हवामान याबद्दल जाणून घेऊयात.

सप्टेंबर म्हणजे पावसाळ्याचा शेवटचा महिना. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

4 सप्टेंबरला मुंबई हवामान विभागाने (आयएमडी) महाराष्ट्र राज्यासाठी हवामान अंदाज आणि इशारे जाहीर केले.

यानुसार आगामी 2 दिवसांत राज्याच्या विविध भागांत पावसाची शक्यता असून, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यासाठी संबंधित जिल्ह्यांमध्ये 4 सप्टेंबरला सतर्कतेचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

4 सप्टेंबरला धुळे, जळगाव, नाशिक (नाशिक जिल्ह्याचा घाटमाथा) आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

या वादळी वाऱ्यासोबतच हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष सूचना

हवामान खात्याने वादळादरम्यान नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, वादळी वारे व विजांचा कडकडाट सुरू असताना शेतातील कामे तात्पुरती थांबवावीत. नागरिकांनी विजेचे खांब आणि तारांपासून दूर राहावे.

तसेच कमकुवत भिंती किंवा झाडांखाली आसरा न घेता पक्क्या इमारतींमध्ये सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

कोकण-गोव्यात 4 आणि 5 सप्टेंबरला बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्रात 4 सप्टेंबरला काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो.

5 सप्टेंबरला याच परिसरात पाऊस तुरळक ठिकाणी मर्यादित राहील.

तर मराठवाड्यात 4 ते 5 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.

पुणे शहर आणि परिसराविषयी सांगायचं झालं, तर 5 सप्टेंबरपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहील. तसेच दुपारनंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भात तापमान वाढणार?

हवामान खात्याच्या नागपूर केंद्राने दिलेल्या अहवालानुसार, विदर्भात सध्या मान्सून कमकुवत स्थितीत आहे.

गेल्या 24 तासांत विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील कोरची व कुरखेडा येथे पावसाची नोंद झाली, तर सिरोंचा, अर्मोरी, चिमूर, सेलू आणि चंद्रपूर येथेही पाऊस नोंदवला गेला.

विदर्भातील जिल्ह्यांसाठी पुढील 5 दिवसांत कोणताही गंभीर इशारा देण्यात आलेला नाही. मात्र, पुढील 48 तासांत विदर्भातील कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)