'देशावर दुष्काळाचे सावट, महागाई वाढण्याची शक्यता'; भारतीय प्रसारमाध्यमांचा इशारा

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

यंदा मान्सून लांबल्यामुळे भारतात जून-जुलै दरम्यान सुरू होणाऱ्या खरिपाच्या हंगामातील पेरण्यांवर आणि एकूणच शेतीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशातील 315 जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन योजना लागू केल्या आहेत.

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील 111 जिल्ह्यांमध्ये सिंचनाची सोय 25 टक्क्यांपेक्षाही कमी असल्यामुळे तिथे तातडीने मदत पोहोचवण्याला प्राधान्य दिलं जाईल.

कोरड्या दुष्काळाचा फटका महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशसह एकूण 12 राज्यांना बसण्याची शक्यता आहे.

जूनच्या मध्यापर्यंत देशभरात 43 टक्के कमी पावसाची नोंद झाली असून मध्य भारतात तर 60 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

'एल निनो'चा प्रभाव आणि कमकुवत मान्सूनमुळे पाऊस मंदावला असून यामुळे भात, मका, सोयाबीन आणि कापूस या प्रमुख पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत.

आजची परिस्थिती 2009 आणि 2015 मधील दुष्काळजन्य वर्षांसारखीच वाटत असली, तरी अजूनही आशा कायम आहे. कारण मान्सूनचा मुख्य पाऊस जुलै आणि ऑगस्टमध्येच पडतो. त्यामुळे ही तूट भरून निघू शकते, असं काही तज्ज्ञांना वाटत आहे.

'द इंडियन एक्सप्रेस'च्या रिपोर्टनुसार, सरकार या अंतर्गत कमी पाण्यात येणाऱ्या बियाणांचा वापर करणे, शेतकऱ्यांना डाळी आणि भरड धान्यांकडे वळवणे आणि पाण्याचा योग्य वापर करणे यावर भर देत आहे.

तसेच पाण्याच्या साठ्यांची डागडुजी करणं आणि जलसंधारणाची कामं वेगानं केली जात आहेत.

या संकटाच्या काळात एक दिलासादायक बाब म्हणजे भारत आधीच्या दशकांच्या तुलनेत या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जास्त सक्षम आहे.

आज देशातील निम्म्याहून अधिक शेती सिंचनाखाली आली आहे. गेल्या वर्षीच्या चांगल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा तुलनेनं समाधानकारक आहे.

तसंच आधुनिक हवामान अंदाज आणि अन्नधान्याचा मोठा राखीव साठा यामुळे भारताची बाजू तशी सुरक्षित आहे.

जागतिक स्तरावर पाहिलं तर, 'एल निनो'मुळे ओढवलेल्या दुष्काळानंतर मार्च महिन्यापासूनच परिस्थिती चिंताजनक बनली होती.

भारताच्या ऊर्जा क्षेत्रातही याचे थेट परिणाम दिसत असून, 'द इंडियन एक्सप्रेस'च्या 25 जूनच्या रिपोर्टनुसार, पाऊस अनिश्चित असल्याने जलविद्युत प्रकल्पांमधील पाणी शेतीच्या सिंचनासाठी वाचवून ठेवले जात आहे.

त्यामुळे 'ग्रिड इंडिया' आता गॅसपासून तयार होणाऱ्या विजेचा वापर वाढवत आहे. हा निर्णय शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची गरज तर पूर्ण करतोच शिवाय ऐन गरजेच्या वेळी देशात विजेचा तुटवडा भासू नये यासाठीही उपयुक्त ठरत आहे.

माध्यमांचा इशारा: देशावर दुष्काळाचे सावट, महागाई वाढण्याची शक्यता

'इंडिया टुडे'च्या एका रिपोर्टनुसार देशात मान्सून दाखल तर झाला पण त्याचा वेग अचानक कमी झाला. त्यामुळे 17 जूनपर्यंत देशातील जवळपास 24 टक्के भाग कोरडाच राहिला आहे.

'विऑन टीव्ही'ने 25 जूनच्या आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कडक ऊन आणि रखडलेला पाऊस यामुळे हवामान बदलाचे आर्थिक चटके सर्वसामान्य आणि गरीब जनतेला बसू लागले आहेत. शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्यास देशातील 90 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांसमोर अन्नधान्याचा प्रश्न उभा राहू शकतो. अशी भीतीही यात व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, 'टाइम्स नाऊ नवभारत' या चॅनेलने 25 जून रोजी 'एल निनो'मुळे मान्सूनचा प्रभाव कमी होण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस कमी होऊन दुष्काळ पडू शकतो आणि पिकांचे नुकसान होऊ शकते.

असं झाल्यास याचा थेट परिणाम लोकांच्या बजेटवर होईल. कारण धान्य आणि भाजीपाला महाग झाल्यामुळे बाजारात महागाई वाढण्याचा मोठा धोका आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)