You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदींवर टीका करताना मेलोनींचा उल्लेख; राहुल गांधी आणि संदीप दीक्षित नेमकं काय म्हणाले?
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (13 ऑगस्ट) दिल्लीतील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांवर तीव्र शब्दांत टीका केली.
राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. या कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर घडलेल्या एका घटनेची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून भाजपने काँग्रेसवर टीका करत, काँग्रेसवर महिलाविरोधी असल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित आणि राहुल गांधी या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत.
सोशल मीडियावरही या घटनेवर जोरदार चर्चा आणि वाद सुरू आहे.
नेमकं काय घडलं होतं?
स्थळ- दिल्लीतील मावळंकर हॉल
प्रसंग: रचनात्मक काँग्रेसचे अधिवेशन
व्यासपीठावर राहुल गांधी उपस्थित होते. ते मोदी सरकारच्या विविध धोरणांवर एकापाठोपाठ एक टीका करत होते. याचदरम्यान त्यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणालाही लक्ष्य केलं.
राहुल गांधी पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्याचा उल्लेख करताना म्हणाले की, 'तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी जात नाही आहात. भारताचे पंतप्रधान मैत्री करायला जात नसतात. त्यांचं काम देशाचं रक्षण करणं आहे. परंतु, यांच्या डोक्यात कुठून आलं माहीत नाही, पण हा माझा मित्र आहे, असं म्हणत ते त्यांना मिठी मारू लागतात.'
राहुल गांधी म्हणाले, "परराष्ट्र धोरण म्हणजे हेच असतं, हे त्यांच्या डोक्यात कसं आलं, हे मला समजत नाही."
यानंतर संदीप दीक्षित यांनी राहुल गांधींना मध्येच थांबवत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा उल्लेख केला. यावरून भाजपने काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
भाजपची तीव्र प्रतिक्रिया
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी संदीप दीक्षित यांचं वक्तव्य 'लाजिरवाणं' असल्याचं म्हटलं आहे.
संदीप दीक्षित यांच्या या वक्तव्यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी आक्षेप नोंदवत जोरदार प्रतिक्रिया दिल्या.
हिमंत बिस्वा सरमा यांनी एक्सवर लिहिलं, "काँग्रेसच्या घराणेशाहीचं नेतृत्व पुन्हा एकदा सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसले आहे. एका मित्र देशाचं नेतृत्व करणाऱ्या महिला राष्ट्रप्रमुखाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली. त्यावेळी व्यासपीठावर आणि प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या महिलाही त्यावर हसताना दिसल्या."
"हे केवळ राजकीय सभ्यता, शिष्टाचाराचं उल्लंघन नाही, तर भारताच्या परराष्ट्र संबंधांचं नुकसान करण्याचाही प्रयत्न आहे. महिलांचा अपमान हीच जेव्हा मनोरंजनाची गोष्ट बनते, तेव्हा त्यातून कोणत्या प्रकारच्या संस्कृतीला प्रोत्साहन दिले जात आहे, हे स्पष्ट होतं. अत्यंत लाजिरवाणं आणि निषेधार्ह आहे."
भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनथी श्रीनिवासन यांनी लिहिलं, "टीका करण्याचा अधिकार प्रत्येक राजकीय पक्षाला आहे. परंतु, महिलांचा अपमान करणं आणि सार्वजनिक जीवनाची थट्टा करणं योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची खिल्ली उडवली जात असताना काँग्रेस नेतेही हसत होते. हे त्यांच्यामध्ये राजकीय परिपक्वतेचा अभाव असल्याचं दाखवून देतं."
भाजपच्या खासदार बांसुरी स्वराज यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याला अशोभनीय आणि असभ्य म्हटलं. राहुल गांधी हे एखाद्या कॉमेडियनसारखे वागत असल्याची टीकाही त्यांनी केली.
काँग्रेसने काय म्हटलं?
एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत सहभागी झालेल्या काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी या घटनेवरून भाजपवरच निशाणा साधला.
त्या म्हणाल्या, "जर तुम्ही या मुद्द्यावर चर्चा करत असाल, तर मोदींनी संसदेत केलेल्या 'शूर्पणखे'च्या वक्तव्यावरही चर्चा करा. बिल्किस बानो प्रकरणातील दोषींचा भाजपने केलेल्या सत्काराचाही उल्लेख करा. बलात्काराचा दोषी गुरमीत राम रहीम याला वारंवार मिळणाऱ्या पॅरोलबद्दलही बोला. तसेच बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी असलेल्या आसाराम बापूसमोर भाजपचे नेते नतमस्तक होतात, याचाही उल्लेख करा."
सोशल मीडियावर लोक काय म्हणत आहेत?
सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. लोक राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांच्याबद्दल मोकळेपणाने आपली मतं मांडत आहेत.
पत्रकार रोहिणी सिंह यांनी एक्सवर लिहिलं, "मेलोनी प्रकरणातून दिसून येतं की, एखादी महिला कितीही मोठ्या पदावर असली तरी ती महिलांविरोधी विचारसरणीपासून सुटू शकत नाही."
"तुम्ही जी-7 पैकी एका देशाच्या पंतप्रधान असलात, तरीही तुमच्याकडे लैंगिक दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ शकतं आणि तुमचा संबंध नसलेल्या राजकीय टीकेतही तुम्हाला ओढलं जाऊ शकतं. सत्तेमुळे महिलेचं पद बदलू शकतं, परंतु तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही."
पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी लिहिलं, "प्रिय संदीप दीक्षित, तुमच्या आई आणि दिवंगत श्रीमती दीक्षित या अशा महिला नेत्या होत्या, ज्यांचा सर्वजण आदर करत होते. परंतु मेलोनी यांच्याबद्दल तुम्ही केलेली महिलाविरोधी आणि लैंगिक टिप्पणी अत्यंत आक्षेपार्ह अशी आहे. राजकारणात अशा वक्तव्याला कोणतीही जागा नसावी. तुमच्याकडून यापेक्षा चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा आहे."
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनीही संदीप दीक्षित यांच्यावर टीका केली. त्यांनी लिहिलं, "काँग्रेसच्या कार्यक्रमात मोदी आणि मेलोनी यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य टाळता आलं असतं. हे वक्तव्य अत्यंत खराब आणि अयोग्य होतं. गंभीर राजकारणाचं रूपांतर मीम किंवा इन्स्टाग्राम रील्सपुरतं मर्यादित करता येणार नाही."
पत्रकार आशुतोष यांनी एका वृत्तवाहिनीवरूल चर्चेमध्ये म्हणाले, "संदीप दीक्षित यांनी जे काही म्हटलं, ते निषेधार्ह आहे. मी त्यांना ओळखतो, ते एक चांगले व्यक्ती आहेत. पण त्यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आणि लाजिरवाणं आहे."
त्यांनी म्हटलं की, सरकार असो किंवा विरोधक, अशाप्रकारची वक्तव्यं करताना करताना काळजी घेतली पाहिजे. कारण त्याचा देशाच्या परराष्ट्र धोरणावर वाईट परिणाम होऊ शकतो.
कमलेश सिंह नावाच्या एका एक्स यूजरने लिहिलं, "राहुल गांधींचा मिठी मारण्याबाबतचा विनोद व्यवस्थित सुरू होता. परंतु, संदीप दीक्षित यांनी मेलोनींचा उल्लेख करून त्याला अशोभनीय वळण दिलं."
"म्हणूनच स्टँड-अप कॉमेडी सहसा एकाच कॉमेडियनचं काम असतं. कॉमेडीच्या जोड्याही असतात, पण त्यासाठी 'टायमिंग' आणि चांगला ताळमेळ लागतो. माझा सल्ला आहे की, आधी थोडी रिहर्सल करत जा."
पत्रकार आणि फॅक्ट चेकर मोहम्मद झुबेर यांनी संदीप दीक्षित यांच्या टिप्पणीला 'असंस्कृत' म्हटलं. त्याचवेळी त्यांनी भाजप नेत्यांवरही अशा प्रकारच्या अश्लील आणि अशोभनीय टिप्पणी करणाऱ्या एक्स अकाउंट्सना फॉलो केल्याचा आरोप केला आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.