You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नेपाळमध्ये पुराचं रौद्ररूप; अर्धा पूल वाहून गेला, ड्रोनमधून दिसली भीषण दृश्यं
नेपाळच्या भोटे कोशी नदीला बुधवारी (26 ऑगस्ट) अचानक आलेल्या पुरामुळे 3 जिल्ह्यांमध्ये मोठा विध्वंस झाला. या पुरामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत किमान 157 जणांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा दलांचे जवान आणि परदेशी पर्यटकांसह अनेक जण अद्यापही बेपत्ता आहेत.
या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. अलीकडच्या काळात नेपाळवर ओढावलेल्या सर्वात भीषण आपत्तींपैकी एक म्हणून याकडे पाहिलं जात आहे.
भूस्खलनामुळे भोटे कोशी नदीची उपनदी ल्हेन्देचा प्रवाह अडवला गेला आणि त्यानंतर पूर आला.
त्यानंतर पुराचं पाणी चीनच्या सीमेजवळ असलेल्या रसुवागढी परिसरातील तिमुरे भागात आधी पोहोचलं.
शेकडो लोक राहत असलेल्या या परिसराचा मोठा भाग हा पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यानंतर पुराचं पाणी वेगाने खालच्या दिशेने वाहत गेलं.
या भागात पावसाचा कोणताही अंदाज नव्हता. त्यामुळे पूर आला तेव्हा लोक आपापल्या दैनंदिन कामात व्यस्त होते.
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, "391 परदेशी नागरिक आणि 44 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह शेकडो लोक बेपत्ता आहेत."
नेपाळ पर्यटन मंडळाने टूर ऑपरेटर्सच्या हवाल्याने सांगितलं की, बेपत्ता भारतीयांपैकी बहुतांश जण कैलास मानसरोवर यात्रेला जाणारे भाविक होते.
नेपाळच्या गृह मंत्रालयाने एका निवेदनात सांगितलं की, रसुवागढी, तिमुरे, स्याफ्रुबेसी आणि मैलुंग या पूरग्रस्त भागांमध्ये लष्कराच्या आणि खासगी हेलिकॉप्टरच्या मदतीने वेगाने बचावकार्य सुरू आहे.
मंत्रालयाने सांगितलं की, सरकारने या पूरग्रस्त जिल्ह्यांना पुढील 3 महिन्यांसाठी 'आपत्ती-प्रवण क्षेत्र' म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.
परराष्ट्रमंत्री खानाल यांनी सांगितलं की, रसुवा जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे 'राष्ट्रीय आणीबाणीसारखी परिस्थिती' निर्माण झाली आहे.
2015च्या विनाशकारी भूकंपानंतर नेपाळवर ओढावलेली ही सर्वात भीषण आपत्ती मानली जात आहे. त्या भूकंपात सुमारे 9 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)