'सरन्यायाधीशांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याबाबत फेरविचार करा', कायद्याच्या विद्यार्थ्यांचे कुलगुरूंना पत्र

    • Author, अमरेंद्र यारलागड्डा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

सरन्यायाधीश सूर्यकांत यांना पदवीदान समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याबाबत फेरविचार करावा, असे पत्र हैदराबाद येथील नॅशनल अ‍ॅकडमी फॉर लिगल स्टडीज अँड रिसर्च युनिव्हर्सिटीच्या (NALSAR) विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना लिहिले आहे. यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.

2026 मध्ये पदवीसाठी पात्र असलेल्या काही विद्यार्थ्यांनी इमेलद्वारे अर्ज केला आहे आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांना कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याबाबत फेरविचार करावा, असे म्हटले आहे.

बीबीसी तेलुगुने या संबंधी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. आपले नाव जाहीर व्हावे, अशी या विद्यार्थ्यांची इच्छा नाहीये. परंतु त्यांनी आपण असा इमेल पाठवला आहे, या गोष्टीला दुजोरा दिला.

या विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू आणि निबंधक (रजिस्ट्रार ) यांना याबाबत इमेल पाठवला आहे.

संबंधित मेल हा 23 जुलैला करण्यात आला आहे. पण ही बाब आता उजेडात आली आहे. या विषयावर विद्यापीठ प्रशासनाची प्रतिक्रिया अद्याप आली नाहीये.

'प्रमुख पाहुण्यांबाबत फेरविचार करावा'

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात, विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यापीठातील अधिकारी आणि प्राध्यापकांना हे समजले की, लवकरच पदवीदान समारंभ होणार आहे आणि त्यासाठी आवश्यक ती तयारी सुरू करावी.

एका प्राध्यापकाने बीबीसी तेलुगुला सांगितले की, विद्यापीठ प्रशासनाने अद्याप पदवीदान समारंभाची तारीख आणि वेळ निश्चित केलेली नाही.

आमच्याकडे ही अधिकृत माहिती आहे की, सरन्यायाधीशांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली आहे, असे या प्राध्यापकाने बीबीसीला सांगितले.

या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता विद्यार्थी किंवा प्राध्यापकांनी आपले नाव या लेखात जाहीर करू नये, अशी विनंती केली आहे.

सरन्यायाधीशांनी या कार्यक्रमाला येण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे.

सरन्यायाधीशांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात येण्याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी इमेलद्वारे केली आहे.

विद्यार्थ्यांचे काय आहे म्हणणे?

"सरन्यायाधीश सूर्यकांत यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आम्हा काही विद्यार्थ्यांना हरकत आहे. अद्याप पदवीदान समारंभाची तारीख आणि वेळ निश्चित झालेली नाही. हे समजते आहे की प्रमुख पाहुण्यांना बोलवण्याबाबत अद्याप चर्चा सुरू आहे. आमचे असे म्हणणे आहे की आमच्या अर्जावर विचार करण्यात यावा," असे विद्यार्थ्यांनी इमेलमध्ये म्हटले आहे.

एका विद्यार्थ्याने म्हटले की, सुरुवातीला केवळ कायद्याच्या विद्यार्थ्यांकडूनच इमेल केला जाणार होता. पण नंतर इतर विभागातली मुलं देखील त्यात सहभागी झाली आणि त्यांनी आपली हरकत इमेलद्वारे नोंदवली.

विद्यार्थ्यांच्या ईमेलनुसार, 20 जुलैला कॉक्रोच जनता पार्टीच्या हाकेनंतर तरुण आणि विद्यार्थ्यांनी दिल्लीत 'चलो संसद' या मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चावेळी विद्यार्थी आणि तरुणांवर लाठीचार्ज झाल्याचे व्हीडिओ देखील समोर आले होते. त्या संदर्भात एका वकिलाने सुप्रीम कोर्टात त्वरित सुनावणी घेण्याची विनंती केली होती.

यावेळी संबंधित वकिलाने म्हटले होते, "पोलिसांनी केलेल्या हिंसेचे व्हीडिओ पुरावे उपलब्ध आहेत. विद्यार्थी जंतर मंतरवर निदर्शनं करत आहेत. पोलीस अतिशय कठोरपणे हे हाताळत आहेत."

यावर प्रतिक्रिया देताना सरन्यायाधीशांनी म्हटले होते , "तुमचा वेळ वाया घालू नका आणि आमचाही वेळ वाया घालवू नका."

हे सगळं इमेलमध्ये लिहित विद्यार्थ्यांनी आपली हरकत नोंदवली आहे.

'शैक्षणिक मूल्यांविरोधातली गोष्ट'

कायद्याचे विद्यार्थी म्हणून आमच्या चिंतेची व्याप्ती मर्यादित आहे. पदवीदान समारंभ सोहळा म्हणजे विद्यापीठाची मूल्यं, घटनात्मक अधिकार, न्याय, अर्ज-विनंतीवर विचार करणे, हरकतींवर चर्चा करणे या मूल्यांबाबत विद्यापीठाच्या असलेल्या कटिबद्धतेचे प्रतीक असते. आपल्या निर्णयांवर विद्यापीठाने विचार करावा, असे हे निमित्त आहे.

पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराबाबतचे आरोप नाकारणाऱ्या व्यक्तीच्या हाताने आपली पदवी घेणे म्हणजे NALSAR मध्ये जी मूल्यं शिकलो त्याच्याशी प्रतारणा करणे आहे, असे विद्यार्थ्यांनी इमेलमध्ये म्हटले आहे.

असे लिहून विद्यार्थ्यांनी पुढे म्हटले की, या सर्व गोष्टींचा विचार करून विद्यापीठाने आपल्या निर्णयाबाबत फेरविचार करावा.

आम्ही विद्यापीठ प्रशासनाला अशी विनंती करतो की, सर्वांना विचारात घेऊन विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करण्यात यावी, असं विद्यार्थ्यांनी म्हटलं.

विद्यापीठाने काय म्हटले?

बीबीसीने NALSAR विद्यापीठाचे कुलगुरू श्रीकृष्ण देव राव आणि निबंधक एन. वासंती यांना इमेल आणि फोन द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत विचारले. त्यांनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिली नाही.

दरम्यान, द हिंदूने असे वृत्त दिले आहे की, सरन्यायाधीश सूर्यकांत हे मुंबई येथील टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये (TISS) 2 ऑगस्टला पदवीदान समारंभासाठी हजर राहणार होते. तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

काही अपरिहार्य कारणांसाठी हा पदवीदान समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे, असे TISS ने 31 जुलै रोजी म्हटले होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)