मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान विभागानं सांगितलं कुठे किती पाऊस पडणार

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

मान्सूननं आज महाराष्ट्रात आणखी आगेकूच केलेली नाही, पण पुढच्या चार दिवसांत राज्यातील आणखी काही भागांत मोसमी वारे सक्रीय होण्याची शक्यता आहे. मान्सून नेमका कुठवर पोहोचला आहे, राज्यात कुठे पावसाची शक्यता आहे? कोणत्या जिल्ह्यांत यलो अलर्ट आहे आणि येत्या काही दिवसांत हवामान कसं असेल, जाणून घेऊयात.

तर, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आज 7 जून 2026 रोजी ईशान्य भारतात आणि बंगालच्या उपसागरात आगेकूच केली आहे. मान्सूननं आता मिझोरम, मणीपूर, नागालँड ही राज्यं, त्याशिवाय त्रिपुरा, मेघालय, आसाम आणि अरुणाचल प्रदेशचा काही भाग व्यापला आहे.

महाराष्ट्रात मात्र मान्सूनच्या स्थितीत बदल झालेला नाही. मान्सूनची उत्तरी सीमा देवगडमधून जाते आहे.

मात्र, पुढच्या तीन चार दिवसांत मान्सून महाराष्ट्रासह अरबी समुद्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशसह ईशान्य भारत, बंगाल आणि सिक्कीमचा काही भाग तसंच छत्तीसगड, ओडिसामध्ये आगेकूच करू शकतो असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

7 जून रोजी दुपारी उपग्रहानं टिपलेली दृश्यं पाहिली, तर उत्तर कर्नाटक, गोवा आणि कोकणावर बरेच ढग जमा होताना दिसतात. मराठवाड्याचा दक्षिणेकडेचा भाग आणि विदर्भातल्या तुरळक ठिकाणीही ढगांचं आवरण आहे.

कसं असेल तापमान?

हवामान विभागाच्या भारत फोरकास्टिंग मॉडेलनुसार पुढच्या तीन चार दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागांत तुरळक ठिकाणी तर किनारी भागांत अनेक ठिकाणी पावसामध्ये हळूहळू वाढ होत जाईल. आठ ते दहा तारखेदरम्यान किनारी भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पावसासोबत राज्यात हळूहळू तापमानात घट होते आहे, पण विदर्भात आणि उत्तर मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्याच्या काही भागात पारा चाळीस अंशांवरच राहील

रात्रीच्या उष्णतेपासून मात्र अजूनही सुटका दिसत नाही. घाटालगतचा काही भाग वगळता, पुढचे 24 ते 48 तास राज्यात रात्रीचं किमान तापमानही 26 ते 32 अंशांच्या आसपास राहील.

कोणत्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

पालघर जिल्ह्यात तर उष्ण आणि दमट हवामानासाठी पुढचे दोन दिवस यलो अलर्ट आहे. 7 जूनच्या रात्रीसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या घाट प्रदेशात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसासाठी यलो अलर्ट आहे. तर रायगड, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशीव, सोलापूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये वीजांसह हलक्या ते मध्यम पावसासाठी यलो अलर्ट आहे.

8 जून रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि साताऱ्यात मध्यम ते जास्त पावसासाठी यलो अलर्ट आहे. तर रायगड, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशीव, लातूर, बीड, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील बहुतांश भागात वीजा, सोसाट्याचा वारा आणि तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासाठी यलो अलर्ट आहे.

6 जून मान्सून महाराष्ट्रात दाखल

राज्यात अखेर पावसाची प्रतीक्षा अखेर संपली असून मान्सून अखेर 6 जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सूनने दक्षिण कोकणाचा काही भाग, तसेच गोव्यात सक्रीयपणे प्रवेश केला आहे.

पावसाच्या आगमनाने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. दरम्यान, आज (7 जून) महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मान्सून राज्याच्या अंतर्गत भागात सरकण्यास अनुकूल परिस्थिती असल्याने 7 जूनला कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच, विदर्भ आणि मराठवाड्यातही वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर कायम राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामे करताना हवामानाचा अंदाज घेऊनच निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, नैर्ऋत्य मान्सूनने वेगाने आगेकूच करत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच ईशान्य भारतातील मोठा भाग व्यापला आहे.

आयएमडीने पुढील 7 दिवसांत केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

तसेच पुढील 2 ते 5 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आणि ईशान्य भारतातील आणखी काही भागांत पुढे सरकण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, 8 ते 12 जूनदरम्यान राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश आणि ओडिशातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

यंदा मोसमी पाऊस सरासरी वेळेच्या 3 दिवस उशिरा म्हणजेच 4 जूनरोजी केरळ येथे दाखल झाला. त्यानंतर मोसमी पावसाची वाटचाल वेगाने सुरू असून गोव्यातील काही भागांत शुक्रवारी (5 जून) पाऊस दाखल झाला.

राज्यातील हवामानाची स्थिती

राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण प्रदेशातील काही भाग आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आली आहे.

तसेच, पुढील 3 ते 4 दिवसांत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

तर, उर्वरित राज्यातील बहुतांश भागांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे असून काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

'एल निनो'चं सावट

दरम्यान, यंदाच्या पावसावर एल निनोचं सावट असणार आहे. भयंकर दुष्काळ पडेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे. जागतिक हवामान संघटनेनं (WMO) 'एल निनो'च्या प्रारंभाला दुजोरा दिलाय आणि जगभरातील तापमान वाढू शकतं, असा इशाराही दिलाय.

यामुळे, भारतातील नैऋत्य मोसमी पावसाळी हंगामातही मोठे बदल घडणार असून शेती, पाणीपुरवठ्यासह देशाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होणार आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)