You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दागिन्यांच्या दुकानात चोरी, पण चोरांनीच केला 112 वर फोन; कारण काय?
गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील उंबरगावमध्ये घडलेल्या कथित चोरीच्या एका अनोख्या आणि धक्कादायक घटनेची सध्या चर्चा होत आहे.
19 ऑगस्ट रोजी चोरी सुरू असताना चोरांनीच 112 हेल्पलाइनवर फोन करून पोलिसांना घटनास्थळी बोलावल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणात दाखल करण्यात आलेली एफआयआर बीबीसी गुजरातीला मिळाली असून, साक्षीदार आणि अधिकाऱ्यांशी बोलून या संपूर्ण घटनेची माहिती घेण्यात आली.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'चोरांनी' पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी त्यांना सुमारे 18 हजार रुपयांचे 'चोरीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू' यांच्यासह पकडलं.
नेमकी घटना काय होती?
या घटनेबाबत माहिती देताना या प्रकरणातील फिर्यादीचा मित्र आणि साक्षीदार असलेले आकाशभाई म्हणाले, "आमच्या घराजवळ संजाण येथे 'बीजे ज्वेलर्स' नावाचं दुकान आहे. माझा मित्र मनीष आणि त्याचं कुटुंब हे दुकान चालवतात."
"या दुकानाच्या अगदी समोर राहणाऱ्या माझ्या एका मित्रानं आणि त्याच्या भावानं 19 तारखेला रात्री उशिरा मला आणि माझ्या भावाला फोन केला आणि दोन चोर इलेक्ट्रिक कटरने कुलूप कापून दुकानात घुसण्याचा आणि चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिली."
आकाशभाई म्हणाले, "निखिल कपाडी आणि त्याचा भाऊ, या दुकानासमोरच राहतात, यांनी आम्हाला ही माहिती दिली."
"घटना घडली त्या दिवशी निखिल रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहत जागा होता. त्याला वारंवार कटरचा आवाज ऐकू येत होता."
"एवढ्या रात्री कोणीतरी काम करत असेल याबद्दल त्याला संशय आला. त्याने पाहिलं की चोर दुकानाच्या शटरचं कुलूप अतिशय सावधपणे कापत होते."
"ते काही वेळ कुलूप कापायचे, मग लपायचे आणि पुन्हा कुलूप कापायला सुरुवात करायचे."
"आश्चर्याची बाब म्हणजे, इलेक्ट्रिक कटर चालवण्यासाठी त्यांनी दुकानासमोर राहणाऱ्या निखिलच्या घराबाहेरील मीटरमधून वीज जोडणी घेतली होती आणि त्याच्याद्वारे कटर चालवत होते."
ते पुढे म्हणाले, "निखिलला कटरचा आवाज ऐकून खाली येता येऊ नये म्हणून त्यांनी खबरदारी म्हणून त्याच्या घराचं बाहेरचं दारही बंद केलं होतं."
आकाशभाई पुढे म्हणाले, "हे कळताच आम्ही सगळे पाच मिनिटांत घटनास्थळी पोहोचलो. तोपर्यंत चोर दुकानाच्या आत शिरले होते."
"आत गेल्यानंतर त्यांनी शटर थोडंसं उघडं ठेवलं होतं. आम्ही पोहोचताच आधी शटर बंद केलं आणि लगेच जवळच्या पोलीस चौकीत जाऊन संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली."
"हे सगळं 45 मिनिटांपासून ते एका तासापर्यंत सुरू होतं. तोपर्यंत पहाटेचे साडेतीन-चार वाजले होते."
"आम्ही दूरध्वनीवरून पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण फोन लागत नव्हता."
"त्यामुळे काही वेळातच मी जवळच्या चौकीतून पोलिसांना घेऊन आलो. मात्र, त्याचदरम्यान दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसह एक पोलीस गाडीही घटनास्थळी पोहोचली."
"तेव्हाच आम्हाला कळलं की चोरांनी दुकानाच्या आतून हेल्पलाइनवर फोन करून पोलिसांना बोलावलं होतं."
पोलिसांनी काय सांगितलं?
संपूर्ण घटनेबाबत उंबरगावचे पीआय एच. डी. तुवर यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं, "चोरांनी दुकानातून पोलिसांना फोन केला होता, हे खरं आहे. मात्र, स्थानिक नागरिकांनीही या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती."
ते पुढे म्हणाले, "चोर दुकानात अडकले होते आणि बाहेर स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे स्वतःच्या सुरक्षिततेची भीती वाटल्याने त्यांनी पोलीस हेल्पलाइनवर फोन करून पोलिसांना घटनास्थळी बोलावलं असावं."
या प्रकरणातील पोलीस कारवाईबाबत ते म्हणाले, "आम्ही या प्रकरणात एफआयआर नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे."
"आरोपींनी पोलिसांना फोन केला असला तरी, पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील वस्तू तपासल्यानंतर त्यांच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने सापडले. ते जप्त करण्यात आले आहेत. आता त्यांना न्यायालयात हजर करून त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येईल."
या प्रकरणात उंबरगाव पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, दोन्ही आरोपी दिनेश पाठक आणि विपिन पाठक हे सध्या महाराष्ट्रात राहत असून मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत.
दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 331(4), 305(A) आणि 54 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्या वकिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतर त्यांची बाजू समोर आल्यानुसार या वृत्तात अपडेट करण्यात येईल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.