कुठे पावसाची शक्यता, तर कुठे विजांच्या कडकडाटासह वादळे; 'असा' आहे आजचा हवामान अंदाज

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

राज्यात 2 जून रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.

याशिवाय उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये, दक्षिण कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे.

विदर्भ वगळता महाराष्ट्र-गोव्यासाठी पुढील 7 दिवसांसाठी वर्तवण्यात आलेल्या अंदाजात हवामान विभागाने म्हटलं, "उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 50-60 किमी वेगाने सोसाट्‌याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे."

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीसाठी मच्छिमारांसाठी इशारा

लक्षद्वीप आणि लगतच्या मालदीवमध्ये, तसेच केरळच्या किनारपट्टीवर आणि समुद्रात ताशी 35-45 किमी वेगाने वारे वाहण्याची आणि वाऱ्याचे झोत ताशी 55 किमी पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, वादळी हवामानाची शक्यता आहे.

मच्छिमारांना उपरोक्त कालावधीत या भागांमध्ये न जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

मुंबई शहर आणि परिसरासाठी पुढील 48 तासांसाठी स्थानिक हवामान अंदाज वर्तवताना हवामान विभागाने म्हटलं की, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहील, तसेच रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या सुमारास मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

कमाल तापमान

पुढील 4-5 दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने हळूहळू घट होईल आणि त्यानंतर त्यात मोठा बदल होणार नाही.

गुजरात प्रदेशात 2 दिवस कमाल तापमानात मोठा बदल होणार नाही आणि त्यानंतर त्यात 2-4 अंश सेल्सिअसने घट होईल.

अरबी समुद्र निरीक्षण

दक्षिण पाकिस्तान आणि लगतच्या नैऋत्य राजस्थानवर समुद्रसपाटीपासून 1.5 किमी उंचीवर एक वरच्या हवेतील चक्रीय प्रवाह आहे.

दक्षिण केरळ आणि लगतच्या तामिळनाडूवर एक वरच्या हवेतील चक्रीय प्रवाह असून तो समुद्रसपाटीपासून 1.5 किमी उंचीपर्यंत पसरलेला आहे.

दक्षिण केरळला लागून असलेल्या आग्नेय अरबी समुद्रावरील वरच्या हवेतील चक्रीय प्रवाह आता समुद्रसपाटीपासून 3.1 ते 7.6 किमी उंचीवर आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या लक्ष‌द्वीप क्षेत्रावर आहे. उंचीनुसार तो नैऋत्येकडे झुकलेला आहे.

नैऋत्य अरबी समुद्र आणि आसपासच्या परिसरातील वरच्या हवेतील चक्रीय प्रवाह कायम आहे. तो आता समुद्रसपाटीपासून 3.1 ते 5.8 किमी उंचीवर दिसून येतो. मध्य पाकिस्तानवरील चक्रीय प्रवाहापासून उत्तर अरबी समुद्रापर्यत समुद्रसपाटीपासून 1.5 किमी उंचीपर्यंत पसरलेला द्रोणीचा पट्टा आता कमी ठळक झाला आहे.

प्रादेशिक हवामान सारांश

दरम्यान, हवामान विभागाने जारी केलेल्या 1 जून रोजीच्या प्रादेशिक हवामान सारांशानुसार उत्तर कोकणातील काही तुरळक भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान होते.

कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस झाला. सौराष्ट्र-कच्छमध्ये हवामान कोरडे होते. रविवारी (31 मे) या प्रदेशातील कमाल तापमानात फारसा बदल झाला नाही. कोकण-गोव्यात ते सरासरीपेक्षा जास्त होते आणि प्रदेशातील इतरत्र सामान्य होते.

सुरेंद्रनगर आणि गांधीनगर येथे नोंदवलेले 41.5 अंश सेल्सिअस हे या प्रदेशातील सर्वाधिक कमाल तापमान होते.

'शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये' - मुख्यमंत्री

याआधी, या वादळी पावसाचा मान्सूनशी संबंध नाही, स्थिर पाऊस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 जून रोजी फेसबुकहून केले होते.

"राज्यात 1 जूनपासून काही भागांत वादळी पावसाची शक्यता असली, तरी त्याचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळ येथे पोहोचलेला नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे."

"विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेश तसेच कोकणातील काही भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता असली, तरी पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम राहू शकतो."

"शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे."

"विजांच्या कडकडाटाच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी. झाडाखाली, टिनशेडखाली, वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळा. स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी," असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले.

जूनमध्ये असं असेल हवामान

महिन्याचा पावसाचा विचार केला तर जून महिन्यात पावसाचं प्रणाम सरासरीच्या 92 टक्केच राहील.

जून महिन्यात देशात बहुतांश ठिकाणी कमाल आणि किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी यंदा जूनमध्येही नेहमीपेक्षा जास्त दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, बिहार, ओडिसा, छत्तीसगड, गुजरात, आंध्र प्रदेशमध्ये जास्त दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता जास्त आहे.

जुलै महिन्यासाठीचा अंदाज हवामान विभाग जून महिन्याच्या अखेरीस वर्तवेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)