You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात आज 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, असा आहे पुढील 4 दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज
पावसाळा संपत आला असला तरी येत्या आठवड्यात म्हणजेच 11 सप्टेंबरपासून राज्यात पाऊस आणि वादळी वाऱ्याचा जोर वाढण्याची दाट शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने 11 ते 17 सप्टेंबर 2026 दरम्यान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी हवामानाचा अंदाज आणि इशारा जारी केला आहे.
11 सप्टेंबरला कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
तर 12 आणि 13 सप्टेंबरला राज्यात काही ठिकाणी पावसाची तीव्रता लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता आहे.
याच दरम्यान राज्यात गणेशोत्सव साजरा होतो.
12 आणि 13 सप्टेंबरला पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहू शकते.
याच काळात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
13 सप्टेंबरला धुळे, नंदुरबार, नाशिकच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
12 आणि 13 सप्टेंबरला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचे वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तया 2 दिवसांसाठी येलो अलर्टही देण्यात आला आहे.
याच दरम्यान जालना, बीड, परभणी, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
विदर्भातील 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहू शकते.
याच काळात अकोला, भंडारा, बुलढाणा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तापमानातील बदलाबाबत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात 11 सप्टेंबरपासून पुढील 24 तासांत कमाल तापमानात मोठा बदल होणार नाही.
मात्र, त्यानंतरच्या 3 दिवसांत कमाल तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसने हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत 11 सप्टेंबरपासून पुढील 48 तासांत ढगाळ वातावरण राहण्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत ताशी 40 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने समुद्र खवळलेला राहील. त्यामुळे मच्छिमारांनी 11 ते 15 सप्टेंबर या काळात समुद्रात जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी काढणीस आलेली पिके तातडीने काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, फळझाडे आणि पिकांना आधार द्यावा, तसेच शेतातून पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.
विजांच्या कडकडाटादरम्यान जनावरांना गोठ्यात सुरक्षित ठेवावे. उघड्यावर किंवा झाडांखाली थांबणे टाळावे, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)