You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कमी दाबाच्या क्षेत्राचा पावसावर कसा परिणाम होईल? जाणून घ्या पुढच्या 4 आठवड्यांचा अंदाज
महाराष्ट्रात काही भागांत जोरदार पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी अजून तो फारसा बरसलेला नाही.
पुढच्या 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांमध्ये हवामान कसं असेल आणि कुठल्या जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट दिले आहेत? तसंच, बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या प्रणालीचा राज्यातील पावसावर काय परिणाम होईल, हेही जाणून घेऊयात.
मान्सूननं आज आणखी आगेकूच केली असून आता दिल्लीही व्यापली आहे.
आज 2 जुलैला उपग्रहानं टिपलेल्या चित्रात भारताचा हा सगळा भाग मान्सूनच्या ढगांनी व्यापलेला दिसतो. महाराष्ट्रातही विशेषतः विदर्भ आणि किनारी भागांत ढग दाटले आहेत. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही तुरळक ढग दिसतायत.
सध्या बंगालच्या उपसागरात ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. तीन जुलैपर्यंत हे क्षेत्र तयार होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता, पण दोन जुलैलाच इथे ही प्रणाली तयार झाली आहे.
ती आत सरकेल तसं समुद्रावरून येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांनाही बळ मिळतं, आणि त्यातून मध्य भारतात तसंच महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसात वाढ होते. पुढच्या दोन तीन दिवसांत तसंच घडण्याची शक्यता आहे.
बीबीसी वेदर फोरकास्टनुसार आज दोन जुलैच्या उत्तरार्धात आणि तीन जुलैलाही कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळू शकतो. पण विदर्भातही बऱ्यापैकी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. शुक्रवारी आणि शनिवारी राज्याच्या अंतर्गत भागात, मराठवाड्यातही पावसाची शक्यता आहे. रविवारच्या आसपास मुंबई आणि कोकणात तसंच मध्य महाराष्ट्रातल्या तुरळक ठिकाणी अतीजोरदार सरींची शक्यता आहे, अस आताच्या फोरकास्टनुसार दिसतंय. या भागातील लोकांनी हवामानाच्या अपडेट्सवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.
2 जुलै रोजी कोकणातील पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतीजोरदार पावसासाठी हवामान विभागानं रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी तसंच पुण्याचा आणि साताऱ्याचा घाट प्रदेश इथे जोरदार पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे. विदर्भात अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, बुलढाणा, गोंदिया, चंद्रपूर इथे वीजा आणि ढगांच्या गडगड़ाटासह मध्यम ते जोरदार पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे. तर राज्यात इतर बहुतांश भागात यलो अलर्ट आहे.
3 जुलैसाठी हवामान विभागानं कोकणात रायगड जिल्हा आणि लगतच्या पुण्याच्या घाट प्रदेशात रेड अलर्ट आहे तर ठाणे, मुंबई, पालघर रत्नागिरी हे जिल्हे आणि सातारा व कोल्हापूरच्या घाट प्रदेशात जोरदार पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे. बुलढाणा, अकोला, अमरावतीलाही विजांसह पावसासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर विदर्भात बाकी ठिकाणी विजांसह पावसासाठी यलो अलर्ट दिला आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, संभाजीनगर अहिल्यानगर, जालना, बीड आणि परभणीतही यलो अलर्ट आहे.
हवामानाविषयीचे अपडेट्स आणि माहितीसाठी बीबीसी न्यूज मराठीला फॉलो करत राहा. तुमचे प्रश्न आणि प्रतिक्रिया खाली कमेंटसमध्ये जरूर नोंदवा.
पुढच्या चार आठवड्यांचा अंदाज
दर गुरुवारी हवामान विभाग पुढच्या चार आठवड्यांचा विस्तारीत अंदाज जाहीर करतो.
- 2 जुलैच्या विस्तारीत अंदाजानुसार, पुढच्या दोन आठवड्यांत राज्यात आणि देशात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- 2-9 जुलै या पहिल्या आठवड्यात राज्यात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल.
- 9-16 जुलै या आठवड्यात उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पण इतर ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
- 16-23 जुलै & 23 जुलै -3 ऑगस्ट या आठवड्यात मान्सूनच्या पावसात खंड पडण्याची चिन्हं आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)